इथेनॉलच्या आर्थिक समस्येवर तोडगा काढण्याची मागणी

पुणे: देशात आज अखेर 187 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदाचे एकूण साखर उत्पादन 314 लाख टन होण्याचा अंदाज असून गेल्यावर्षी 331 लाख टन उत्पादन झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे 17 लाख टनांनी कमी असले तरी वर्षाअखेर 85 ते 80 लाख टन साखर शिल्लक राहणे अपेक्षित आहे.

आणखी 15 लाख टन साखरेच्या इथेनॉल निर्मितीस परवानगी द्यावी, अशी विनंती राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने केंद्र सरकारला केली आहे. यामुळे कारखान्यांत पडून असलेल्या बी हेवी मळीचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होऊन आर्थिक समस्येवर तोडगा निघू शकेल, असे मत संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केले आहे.

देशात जानेवारी अखेर देश पातळीवरील एकूण 517 कारखान्यांमधून 1 हजार 128 लाख टन ऊस गाळप झाले असून त्यातून सरासरी 9.71 टक्के उतार्‍यासह 187 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटकमधील 5 व गुजरातमधील 1 अशा 6 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. देशपातळीवरील ऊस गाळपात अग्रक्रम राखलेल्या महाराष्ट्राने आतापर्यंत 676 लाख टन उसाचे गाळप केले असून त्यातून सरासरी 9.60 टक्के उतार्‍यासह 65 लाख टन साखर उत्पादन केले आहे. या गतीने महाराष्ट्रातील हंगाम एप्रिलच्या मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशातील ऊस गाळप 574 लाख टन झाले असून त्यातून सरासरी 10.5 टक्के उतार्‍यासाह 57.65 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम मे च्या मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे. कर्नाटकमध्ये 377 लाख टन ऊस गाळपातून सरासरी 9.75 टक्के उतार्‍यासह जवळपास 37 लाख टन उत्पादन झाले आहे. उर्वरित सर्व राज्यातील होणारे ऊस गाळप, साखर उतारा आणि होणारे साखर उत्पादन लक्षात घेता अखेर देश पातळीवर 314 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *